अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने तातडीने मदत करावी – मुख्यमंत्री मा देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री मा.एकनाथ शिदे यांचे अमित शाह यांना निवेदन
वृत्तसंस्था नवी दिल्ली(nm news agency (international)
महाराष्ट्रात मागील काही दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. मोठ्या प्रमाणावर खरीप पिके, फळबागा, भाजीपाला तसेच शेतकऱ्यांच्या पायाभूत साधनांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी वर्ग हतबल झाला आहे. अनेक ठिकाणी शेतजमिनी पाण्याखाली गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.
या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री मा.देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री मा.एकनाथ शिन्दे यांनी आज देशाचे गृहमंत्री मा. अमितभाई शाह यांना सविस्तर निवेदन सादर केले. या निवेदनातून एनडीआरएफमार्फत महाराष्ट्रातील नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत तातडीने उपलब्ध करून द्यावी, अशी ठाम मागणी करण्यात आली.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, शेतकऱ्यांचे झालेले नुकसान केवळ शेतीपुरते मर्यादित नसून त्याचा परिणाम ग्रामीण अर्थव्यवस्थेवर मोठ्या प्रमाणात होणार आहे. कर्जबाजारीपणात दिवस काढणाऱ्या शेतकऱ्यांच्या हातून जगण्यासाठीची साधनेच नष्ट झाली आहेत. अशा वेळी केंद्र सरकारकडून तातडीची मदत मिळणे आवश्यक आहे, अशी भूमिका मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी स्पष्ट केली.
तसेच पंचनामे वेगाने पूर्ण करून शेतकऱ्यांना थेट त्यांच्या खात्यात मदत जमा करण्याची मागणीही या निवेदनातून करण्यात आली. “शेतकऱ्यांचा घाम व्यर्थ जाऊ नये; त्यांचा विश्वास टिकवणे ही सरकारची जबाबदारी आहे,” असे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी यावेळी स्पष्ट केले.













