विदर्भ राज्य आंदोलन समितीचे दुसरे अधिवेशन २३ व २४ मार्च रोजी नागपुरात
S bharat news network
गडचिरोली, ता. ५ : विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या नागपूर येथील मुख्यालयात विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष माजी आमदार अॅड. वामनराव चटप यांचा अध्यक्षतेखाली १७ जानेवारी रोजी पार पडलेल्या बैठकीत २३ व २४ मार्च २०२५ रोजी विदर्भ राज्य आंदोलन समितीचे दुसरे अधिवेशन नागपूरात आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती बुधवार (ता. ५) पत्रकार परीषदेत देण्यात आली.
या पत्रकार परीषदेत समितीचे पदाधिकारी म्हणाले की, २३ मार्च रोजी सकाळी १० वाजतापासून ते २४ मार्च दुपार १ वाजेपर्यंत प्रतिनिधी अधिवेशन होणार आहे. २४ मार्च रोजी १ वाजतानंतर खुले अधिवेशन होणार आहे. या मध्ये १२० तालुक्यांचे प्रतिनिधी व पदाधिकारी हजर राहणार आहेत. तसेच या अधिवेशनात विदर्भातील सर्व प्रश्नांवर विषयवार चर्चा होणार असून विदर्भातील अनुशेषावरही चर्चा होणार आहे. तसेच राज्याची आर्थिक स्थिती दिवाळखोरीची असल्यामुळे शेतकरी आत्महत्या, सामाजिक, आर्थिक प्रश्न , बेरोजगारीमुळे फोफावलेला नक्षलवाद, कुपोषणाचा प्रश्न, अद्ययावत मशिनरी आर्थिक ताकद नसल्याने प्रदुषण नियंत्रित करणारी आधुनिक मशीनरी सरकार लावू शकत नाही. शिवाय नैसर्गिक संसाधने व मोठ्या प्रमाणात जंगल असूनही विदर्भात अतिरिक्त वीज असूनही, बारामाही नद्या असूनही सरकारची गुतंवणुकीची आर्थिक क्षमता नसल्यामुळे येथे कारखानदारी उभी होऊ शकत नाही, त्यामुळे युवकांसमोर उभा असलेला बेरोजगारीचा प्रश्न सुटूच शकत नाही. त्यामुळे या प्रश्नाचे एकच उत्तर म्हणजे विदर्भाचे स्वतंत्र राज्य होणे हेच आहे. विदर्भाविषयी सर्व पार्श्वभुमी, सर्व तज्ज्ञ मार्गदर्शक मांडणार आहेत. तसेच विदर्भाचे राज्य सक्षम व शिलकीचे होणार आहे ही सत्यस्थिती प्रसिध्द अर्थतज्ञ डॉ. श्रीनिवास खांदेवाले विदर्भाचा अर्थसंकल्प सादर करून जनते समोर मांडणार आहेत. विदर्भाच्या जनतेने २३ व २४ मार्च रोजी नागपूरात आयोजित या अधिवेशनात हजारोच्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन विदर्भ राज्य आंदोलन समितीने केले आहे. या पत्रकार परीषदेला समितीचे पूर्व विदर्भ अध्यक्ष अरुण केदार, युवा आघाडी विदर्भ प्रदेश अध्यक्ष मुकेश मासुरकर, नागपुर जिल्हाध्यक्ष प्रशांत नखाते, समन्वयक अरुण पाटील मुनघाटे, दक्षिण गडचिरोली जिल्हाध्यक्ष राजेंद्रसिंह ठाकुर, राजकुमार रोडे, अशोक पोरेड्डीवार, घिसू खुणे पाटील, नासीर जूम्मन शेख, आर्शी शेख, मोतीराम लाटेवार, बी. एन. बर्लावार, रमेश भुरसे, शरद पाटील ब्राह्मणवाडे आदी उपस्थित होते.