गडचिरोली,ता.३०: शाळा सुरु झाल्याच्या आजच्या पहिल्या दिवशी आष्टी-आलापल्ली मार्गावर एकही बस धावत नसल्याने संतप्त पालक आणि विद्यार्थ्यांसह काँग्रेस कार्यकर्त्यांनी पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या नेतृत्वात सुभाषनगर येथे रास्ता रोको आंदोलन केले.
सुरजागड लोहखाणीतून लांब पल्ल्याच्या ट्रकमधून लोहखनिजाची वाहतूक करण्यात येत असल्याने आष्टी-आलापल्ली मार्गाची प्रचंड दूरवस्था झाली आहे. त्यामुळे परिवहन महामंडळाने या मार्गावरुन धावणाऱ्या बसेस बंद केल्या आहेत. परिणामी आज शाळेच्या पहिल्याच दिवशी शेकडो विद्यार्थ्यांना फटका बसला. त्यामुळे संतप्त विद्यार्थी, पालक आणि नागरिकांनी सुभाषग्राम येथे आंदोलन केले.
एककीडे भाजप सरकार ‘बेटी बचाव बेटी पढाव’च्या गोष्टी करते. मात्र, त्याच मुलींना चांगले शिक्षण द्यायचे झाल्यास काढता पाय घेते. रस्त्याची दुरुस्ती करुन बसेस सुरु कराव्या अशी मागणी असताना सरकार त्याकडे दुर्लक्ष करुन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करीत असल्याचा आरोप काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे mahendra bramhanvade gadchiroli यांनी केला.काही वेळानंतर अहेरीचे तहसीलदार फारुख शेख, पोलिस निरीक्षक किशोर मानभाव, आगार व्यवस्थापक जितेंद्र राजवैद्य यांनी आंदोलस्थळी भेट देऊन आंदोलकांच्या समस्या जाणून घेतल्या. सोमवारपासून नियमित बससेवा सुरु करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन थांबविण्यात आले या आंदोलनात काँग्रेसचे प्रदेश महासचिव डॉ. नामदेव किरसान, अहेरी तालुकाध्यक्ष डॉ. निसार हकीम, काँग्रेस नेते हरबाजी मोरे, युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष रजाक पठाण, उपाध्यक्ष राघोबा गौरकर, आदिवासी सेलचे तालुकाध्यक्ष मधुकर सडमेक, किसान सेल तालुकाध्यक्ष नामदेव आत्राम, अल्पसंख्याक आघाडीचे तालुकाध्यक्ष हनिफ शेख, गणेश उप्पलवार, रुपेश बंदेला, दिनकर हुलके, देशमुख, पोरेडीवार, बेबी कुत्तरमारे यांच्यासह शेकडो विद्यार्थी, पालक, महिला आणि काँग्रेस कार्यकर्ते सहभागी झाले होते.