वनसंपदा आणि संसाधनांचा वापर करून विद्यार्थ्यांना शिक्षण दिले तर हे विद्यापीठ राज्यातील एकमेव विद्यापीठ बनू शकेल; माजी कुलगुरू डॉ. शरद निंबाळकर 

133

वनसंपदा आणि संसाधनांचा वापर करून विद्यार्थ्यांना शिक्षण दिले तर हे विद्यापीठ राज्यातील एकमेव विद्यापीठ बनू शकेल; माजी कुलगुरू डॉ. शरद निंबाळकर

 

मोहन हिराबाई हिरालाल यांना ‘जीवन साधना गौरव ‘पुरस्काराने सन्मानित

 

गडचिरोली (Gadchiroli-gondwana university)दि.२ –

गोंडवाना विद्यापीठ परिसरात वनसंपदा आणि संसाधनांचा खजिना आहे. या साधनसंपत्तीचा वापर करून विद्यार्थ्यांना या खजिन्यावर आधारित शिक्षण दिले तर हे विद्यापीठ राज्यातील एकमेव विद्यापीठ बनू शकेल.

 

असे प्रतिपादन पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.शरद निंबाळकर यांनी आज दुपारी येथील गोंडवाना विद्यापीठाच्या वर्धापन दिन कार्यक्रमात बोलताना केले.

 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे होते, तर गडचिरोली-चिमूरचे लोकसभेचे खासदार अशोक नेते, गडचिरोलीचे आमदार डॉ. देवराव होळी, प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ. अनिल हिरेखन यांची प्रमुख उपस्थिती होती.

 

प्रख्यात समाजसेवक मोहन हिराबाई हिरालाल यांना त्यांच्या समाजातील अतुलनीय सेवेबद्दल मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह, शाल आणि पुष्पगुच्छ देऊन विद्यापीठाच्या ‘जीवन साधना गौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

 

मानवी जीवनातील शिक्षणाचे मूल्य सांगून डॉ. निंबाळकर पुढे म्हणाले की, शिक्षण हा माणसाचा अलंकार आहे. माणसाला त्याच्या शिक्षणामुळे मान मिळतो. शिक्षण नसलेला माणूस हा सर्वात मागासलेला मानला जातो. माणूस संपत्तीने नव्हे तर शिक्षणाने ओळखला जातो.

 

शिक्षण ही एक संपत्ती आहे. शिक्षणाशिवाय माणूस हा जनावरासारखा आहे. शिक्षण माणसाला यशस्वी बनवते, त्याचे जीवन सुंदर बनवते. ज्ञान ही अशी गोष्ट आहे जी माणसाला स्वतःच्या गुरुचाही स्वामी बनवते. असे शिक्षण आणि ज्ञानाचे गुण आहेत त्यामुळेच महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिक्षणाला इतके महत्त्व दिले, असे डॉ.निंबाळकर यांनी आपल्या विचारप्रवर्तक भाषणात सांगितले.

 

गडचिरोली जिल्ह्यातील विपुल नैसर्गिक साधनसंपत्तीचा उल्लेख करून डॉ. निंबाळकर म्हणाले की, या साधनसंपत्तीचा वापर केला पाहिजे आणि विद्यार्थ्यांना जंगल आणि त्यातील गुणधर्म या विषयावर शिक्षण दिले पाहिजे जेणेकरून ते रोजगार शोधणारे नव्हे तर ते रोजगार देणारे होतील.

 

विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्चित करावे. मोठे शास्त्रज्ञ हे त्यांचे आदर्श असावेत. त्यांनी स्वतःला इतरांपेक्षा कमी समजू नये. माणसाची ओळख त्याच्या जातीने किंवा धर्माने नव्हे तर त्याच्या शिक्षणाने झाली पाहिजे, असे डॉ.निंबाळकर पुढे म्हणाले.

 

सत्कार प्रसंगी मोहन हिराबाई हिरालाल म्हणाले की, महात्मा गांधींनी सांगितलेली अहिंसा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेली समता ही दडपल्या गेलेल्या समाजाला पुढे नेण्यासाठी सहसंबंधित साधने आहेत. या दोन गोष्टी वेगळ्या आहेत असे म्हणणे चुकीचे आहे. या दोन्ही नेत्यांना मानवतेच्या आधारे समाजात बदल हवा होता. हे विचार पुढे नेण्याची गरज आहे.

 

लेखामेंढा गावाचा त्यांनी यावेळी आवर्जून उल्लेख केला .दिल्ली मुंबईत आमच सरकार आमच्या गावात आम्हीच सरकार घोषणा देऊन अमलात आणणारं लेखामेंढा गाव आहे. मला या गावापासून खूप शिकायला मिळाले. जगाला एक नवी वाट दाखवून देण्याचे काम हे गाव करीत आहे असे म्हणत समाजसेवक देवाजी तोफा यांच्या कामाचे त्यांनी कौतुक केलं.

 

यावेळी श्री.अशोक नेते व डॉ.देवराव होळी यांचीही भाषणे झाली व विद्यापीठाच्या विकासासाठी आवश्यक ते प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

 

अध्यक्ष स्थानावरून बोलताना गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.प्रशांत बोकारे म्हणाले, गडचिरोली जिल्ह्याला बाहेरचे लोक मागास म्हणतात पण खरं पाहता हा सगळ्यात प्रगत असा भाग आहे आणि इथे समृद्ध असं जंगल आहे .एखादं बी पेरल्यानंतर त्याची फळे आणि फुले फळाला येतात तसेच विद्यापीठाचे फळे आता आपल्याला दिसायला लागतील. प्राध्यापकांनी अगदी तळागाळातल्या भागात संपर्क अभियान राबवले. त्याचंच फलित म्हणजे मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांनी मोफत प्रवेश घेतला आहे. काही महिन्यातच विद्यापीठात अनेक सकारात्मक बदल होऊन राष्ट्रीय स्तरावर विद्यापीठाचा नावलौकीक होईल.

 

डॉ. शिल्पा आठवले यांनी मोहन हिराबाई हिरालाल यांच्या मानपत्राचे वाचन केले डॉ.श्रीराम कावळे यांनी प्रास्ताविक, डॉ.नरेंद्र आरेकर यांनी संचालन तर आभार डॉ.अनिल हिरेखान यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here